अध्यक्ष संदेश
आनंद म्हणजे जेव्हा आपण काय विचार करता, आपण काय म्हणता आणि आपण जे करता ते सुसंगत असते - महात्मा गांधी
आपल्या स्वार्थासाठी समाजात जाणीवपूर्वक धार्मिक जातीय द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या विघातक विचारांना समाजाने थारा देता कामा नये.
समाजात जाणीवपूर्वक धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विघातक प्रवृत्तींचा विरोध करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समाज एकसंघ राहिला, तरच शांतता आणि समृद्धी नांदू शकते. जेथे नागरिक एकत्रितपणे नांदतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि संवाद साधतात, तेथे मतभेदही चर्चा आणि न्यायाच्या मार्गाने सोडवले जातात. विविध भाषा, धर्म आणि परंपरा असलेल्या समाजातील माणसे परस्परांचा आदर करतात, त्यांच्या संस्कृतीप्रती जिव्हाळा आणि प्रेम बाळगतात.भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक असून, संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीवर आधारित आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात किंवा भाषेच्या संकुचित चौकटीत अडकत नाही. अन्यथा, महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. अशा असंख्य उदाहरणांमधून समाजातील व्यापक स्वीकाराचा संदेश मिळतो. धर्म, जात आणि प्रदेशाचा अभिमान असावा, पण त्याचा अहंकार होऊ नये किंवा त्यातून द्वेषाची भावना निर्माण होऊ नये. आज जगभर स्वार्थासाठी द्वेष आणि मत्सर पसरवला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे नुकसान होत आहे. "Eye for an eye makes the whole world blind" ही शिकवण विसरता कामा नये. समाजाने या विघातक विचारांना थारा न देता, एकोपा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. एकतेतच आपली खरी ताकद आहे!